आपल्याला काय वाटतं, भाषा म्हणजे काय? फक्त बोलण्याचं, आपलं म्हणणं दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक साधन? अहो, साफ चुकीचा विचार आहे हा! ती एक स्वतंत्र अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरंय. तिचे स्वतःचे नियम आहेत, तिचं स्वतःचं मूल्यमापन आहे, आणि त्यात सतत गुंतवणूक आणि घट होत असते. आणि गंमत म्हणजे, आपल्यापैकी बहुतेकांना याची कल्पनाही नसते की असं काही अस्तित्वात आहे!
आता पैशांचं उदाहरण घेऊया. पूर्वी जेव्हा पैसे नव्हते, तेव्हा व्यापार कसा चालायचा? वस्तूंच्या बदल्यात वस्तू, सगळा गोंधळच गोंधळ! पण जेव्हा पैशाचा शोध लागला, तेव्हा केवळ व्यवहार सोपे झाले नाहीत, तर देवाणघेवाणीचं संपूर्ण चित्रच पालटून गेलं. अगदी तसंच भाषेचं आहे. नुसते हातवारे करून किंवा हूं-हां करून एखादं केळं कदाचित मिळेलही, पण कोणतीही मोठी गोष्ट उभी करायची असेल – मग ती एखादी कंपनी असो, वैज्ञानिक शोध असो, किंवा आपली संस्कृती – त्यासाठी एका सामायिक, प्रमाणित भाषिक व्यवस्थेची गरज लागते. ही व्यवस्था म्हणजेच भाषा, आणि ती आपल्या आधुनिक जीवनाचं एक अदृश्य वंगण आहे.
पण एक गोष्ट लक्षात घ्या – भाषा म्हणजे काही दगडी मूर्ती नव्हे की तिचं रूप आणि मूल्य कायम टिकून राहील. तिचं मूल्य तिच्यात उपजत नसतं, ते आपण, समाज ठरवतो. म्हणूनच ते सतत वर-खाली होत असतं. तुम्हाला लॅटिन भाषा आठवतेय? एके काळी विद्वान आणि सम्राटांची भाषा होती ती! पण ती केवळ विस्मृतीत गेली नाही, तर तिचं महत्त्व पद्धतशीरपणे कमी केलं गेलं. शिकणारे कमी झाले, तिच्यातले महत्त्वाचे ग्रंथ कमी झाले, आणि तिचं बाजारातलं मूल्य घसरलं. गंमत बघा, जी भाषा एकेकाळी दुर्मिळ म्हणून मौल्यवान होती, तीच दुर्मिळता तिच्या अस्ताला कारणीभूत ठरली. दुर्लक्ष केल्यावर मौल्यवान ठेवा कसा मातीमोल होतो, याचं हे उत्तम उदाहरण!
अनेकांना वाटतं की भाषा आपोआप बदलते, विकसित होते. ही एक नैसर्गिक, निष्क्रिय प्रक्रिया आहे. पण हे साफ खोटं आहे! हा एक सांघिक प्रयत्न आहे. आपण वापरलेला प्रत्येक नवीन शब्द, प्रत्येक भावनिक छटा, प्रत्येक सुंदर वाक्यरचना म्हणजे आपण त्या भाषेच्या बँकेत केलेली एक गुंतवणूक असते. हे फक्त भाषा वापरणं नाही, तर भाषेत गुंतवणूक करणं आहे. आणि कुठल्याही गुंतवणुकीप्रमाणे, यातूनही परतावा मिळतोच. जितकी भाषा समृद्ध, अर्थवाही, तितकी ती अधिक उपयुक्त, सुंदर आणि म्हणूनच अधिक हवीहवीशी वाटते. आणि याच आकर्षणातून लोक ती स्वीकारतात.
यामुळे एक असं न संपणारं चक्र सुरू होतं. जेव्हा एखाद्या भाषेला प्रतिष्ठा मिळते – मग ती यशाशी, सर्जनशीलतेशी किंवा एखाद्या आधुनिक जीवनशैलीशी जोडलेली असो – तेव्हा लोकांना ती शिकाविशी वाटते. वापरणारे वाढले की साहित्य, चित्रपट, सॉफ्टवेअर असं सगळंच त्या भाषेतून वाढतं, आणि तिची प्रतिष्ठा आणखीनच उंचावते. आज इंग्रजी जगभर पसरलीय, पण ती काही अपघाताने नाही. तिच्यातून होणारी प्रचंड मोठी नवनिर्मिती, आणि ती देत असलेल्या संधी, यामुळेच लोक तिच्याकडे ओढले जातात.
आता दुसरी बाजू बघूया. जेव्हा एखादी भाषा दुर्लक्षित होते, बाजूला सारली जाते, तेव्हा काय होतं? फक्त माहिती मिळत नाही एवढंच नाही, तर त्या भाषेचं आणि तिच्या भाषिकांचं एक प्रकारचं ‘भाषिक तसच आर्थिक अवमूल्यन’ होतं. म्हणजे, जागतिक पातळीवरच्या संवादात त्यांना पुरेसा वाव मिळत नाही. भाषा म्हणजे केवळ शब्दांचा ढिगारा नव्हे. ती संस्कृती, इतिहास आणि जगाकडे पाहण्याचा एक खास दृष्टिकोन आपल्यात सामावून घेते. भाषा गमावणं म्हणजे हा दृष्टिकोन गमावणं, जगाला समजून घेण्याची एक अमूल्य पद्धत कायमची हरवून बसणं.
आपल्या मुंबईचंच उदाहरण घ्या ना! महत्त्वाकांक्षेने ओसंडून वाहणारं शहर, पण इथेच मराठीची कशी हळूहळू पिछेहाट होतेय, हे आपण पाहतोच आहोत. ज्या बॉलीवूडचा पाया एका मराठी माणसानं रचला, त्यात मराठी भाषिक नायक/नायिका हिंदी चित्रपटात कधीच नसतात. तेच बॉलीवूड आज मराठी कलाकारांना अनेकदा साचेबद्ध भूमिका (नोकर, कामगार, चपराशी, हवालदार किंवा गुंड) देतो आणि पंजाबी गाणी ‘aspirations’चं प्रतीक म्हणून मिरवतो. हा फक्त भेदभाव नाही, तर हे भाषेच्या अवमूल्यनाचं एक दुष्टचक्र आहे. तुमची जर भाषा श्रीमंत असेल तर तुम्हाला श्रीमंती संधी मिळतात. तुमचा सामाजिक स्तर उंचावतो. इतरांकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक आदरात बदलते.
तुम्ही कधी विचार केलाय का? अमेरिकेतल्या विद्यापीठात किंवा अमेरिकेच्या निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या माहिती पुस्तिकेत तामिळ आणि तेलगू भाषेत माहिती असते. मोठया कंपन्या जेव्हा नवीन सॉफ्टवेअर बाजारात आणतात, तेव्हा बहुतांशी हिंदी, बंगाली, तामिळ, तेलगू भाषिकांना गृहीत धरून भाषेनुसार सोयी आणतात. जेव्हा तुमची भाषा वापरात येते तेव्हा त्यातूनच नवीन संधी मिळत असतात. मग ते भाषा अनुवादन असो कि कॉल सेंटर ची नोकरी असो. नवीन साहित्य निर्मिती असो कि मराठी गायन असो. शुद्ध हिंदी चा अट्टाहास सोडल्यामुळे आता दिल्ली पण पंजाबी भाषेत अडकत चालली आहे. बॉलीवूड संगीत पण आता पंजाबी संगीत झालंय . विदेशात दिलजीत दोसांझ ला कार्यक्रमासाठी अख्ख क्रीडांगण घ्यावं लागतं , आणी मराठी गायकांच्या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांची जमवाजमव करताना आयोजकांचं तोंडाचं पाणी पळतं.
संधीच्या शोधात मराठी माणसंच हिंदी-इंग्रजीच्या मागे लागतात आणि नकळत आपल्याच भाषेचं आणि पर्यायाने फक्त मराठीवर अवलंबून असणाऱ्यांचं महत्त्व कमी करतात. जरी तुम्ही उत्कृष्ट इंग्रजी किंवा हिंदी बोललात तरी तुम्ही तिथे अनेकापैकी एक असता. तुम्हाला स्वतःची अशी ओळख नसते. तुम्ही तिथेही मराठीच असता, स्वतःची ओळख विसरलेले. ओळख म्हणजे फक्त नाव नाही. तुमची ओळख हि तुमच्या सांस्कृतिक नाळेशी घट्ट जोडलेली असते. स्वतःच्या गावात स्वतःची ओळख विसरणे हे चित्र फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही, तर जगभर कमी-अधिक फरकाने हेच घडतंय. म्हणून लक्षात घ्या की फ्रेंच, जर्मन, रशियन, चिनी आपल्या भाषेबद्दल एवढे का आग्रही असतात.
एकच जागतिक भाषा – आणि ती म्हणजे इंग्रजी – असावी, हा विचार खूप आकर्षक वाटू शकतो. पण यात एक मूलभूत सत्य दुर्लक्षित होतं: भाषिक विविधता ही समस्या नसून, ती आपल्या जगाची एक खासियत आहे. प्रत्येक भाषेत जगाकडे पाहण्याचा, गोष्टी समजून घेण्याचा एक स्वतंत्र, अनोखा दृष्टिकोन दडलेला असतो. हे दृष्टिकोन गमावणं म्हणजे सर्वांचंच नुकसान.
आता वेळ आली आहे की आपण भाषेकडे केवळ एक जुनाट, सांस्कृतिक ठेवा म्हणून न पाहता, तिला एक महत्त्वाची आणि आर्थिक, सामाजिक सुबत्ता देणारी ‘संपत्ती’ म्हणून ओळखायला हवं. भाषेचा प्रचार-प्रसार करणं म्हणजे केवळ सांस्कृतिक अस्मिता जपणं नव्हे, तर त्या भाषेच्या लोकांना सक्षम करणं, त्यांना या जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बळ देणं आहे. त्यांच्या वाट्याला येणारं ‘भाषिक अवमूल्यन’ थांबवून, परिस्थिती बदलण्यासाठी सक्रिय प्रयत्न करणं गरजेचं आहे.
नीट विचार करून वापरलेल्या शब्दांची ताकद केवळ दिखाव्यापुरती नसते. ते सोनं-नाणं किंवा कुठल्याही डिजिटल चलनापेक्षाही अधिक मौल्यवान आणि चिरंतन असं चलन आहे. आणि दुर्दैवाने, याच चलनाचं मूल्य आपण सगळे मिळून कमी करत आहोत.
आता जेव्हा आपल्याला कळलं आहे की भाषा हे एक जिवंत चलन आणि एक महत्त्वाचं भांडवल आहे, तेव्हा जरा आपल्या स्वतःच्या भाषिक परंपरेत दडलेल्या या अनोख्या संपत्तीकडे लक्ष द्या. थोडा वेळ काढून आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडले जा. आपल्या मातृभाषेतले बारकावे, तिच्यातल्या गोष्टी, तिच्यातलं खरं सत्त्व जाणून घ्या. या सतत बदलणाऱ्या भाषिक इतिहासात सगळ्यात मोलाची भर आपल्या घरातूनच पडत असते. त्यामुळे, मागे फिरा, आपल्या भाषेशी एकरूप व्हा, आणि आपल्या मातृभाषेच्या समृद्धीसाठी, तिच्या जिवंतपणासाठी सक्रिय योगदान द्यायला लागा. तिचं भविष्य, आणि तुमच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग, तुमच्या सक्रिय सहभागाची वाट बघतोय.
आता गरज आहे ती, मराठी भाषेच्या प्रश्नाकडे हा अस्मितेचा नव्हे तर आर्थिक प्रश्न म्हणून बघण्याचा.